महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
संत निळोबा राययांचा जन्म अहमदनगरच्या कुळकर्णी कुटुंबातला. त्यांनी भक्तिपंथाचे १२००हून अधिक अभंग रचले. शरीर थकेपर्यंत प्रवचने-कीर्तने केली; पण त्यांच्याविषयी फारच थोडी माहिती मिळते व जी माहिती आहे ती परस्परविरुद्धसुद्धा आहे.
निळोबांवर संत तुकारामांच्या रचनांचा प्रभाव होता; मात्र त्यांची तुकारामांशी भेट मात्र होऊ शकली नाही, असे म्हटले जाते. त्यांच्या अभंगांच्या अखेरीस ‘निळा म्हणे’ असा उल्लेख आढळतो.
निळोबांच्या रचना भावपूर्ण व रसाळही आहेत. त्यांच्या अभंगांत विठ्ठलभक्तीबरोबरच श्रीकृष्ण स्तुती ठायी ठायी आढळते. त्यांनी कृष्ण चरित्रसुद्धा लिहिले.
निळोबाराय यांचे काही अभंग मला मिळाले आहेत; पण त्यांच्या रचनाकाराबद्दल ठोक सत्य माहिती न मिळाल्याने ते इथे देत नाही; मात्र विकिपीडियावर त्यातील काही उपलब्ध आहेत.
- भारतकुमार राऊत